alak ati laghu katha........ paus majha sobati
तो एकटक आभाळाकडे डोळे लावून बसला होता ..... महिन्यापूर्वीही तसाच आस लावून बसला होता सरी कोसळतील नि वाफाळून निघालेलं शेत आत आत भिजेल म्हणून ....पाऊस आला ..पेरणी झाली ...हिरवे तृणांकूर उगवले ..... वाढताहेत पिकं म्हणून त्यानं समाधानाचा सुस्कारा सोडला ..... नि कूस फाटल्यासारखा पाऊस धो धो कोसळू लागला ..पाहता पाहता हिरव्या पिकांनी मान टाकली ...घरावरचं छप्पर उडालं ..गुरंढोरं वाहून गेली ...बायका पोरं यांच्या किंकाळ्या .. गर्भवतींची ओली कूस ..म्हाताऱ्याकोताऱ्यांच्या असहाय हाका ....दूधपित्या मुलांचे आक्रोश ...... पाऊस वैरी झाला ......सोयऱ्यानीच वैर धरलं तर कुठं न्याय मागावा ?... आणि जपायला उरलंय तरी काय मागं ..... कोणासाठी जगायचं नि कुणाची आस धरायची?.... उजाड मनानं तो स्वतःशीच झगडत राहिला ..... झोपेनं त्याला कवेत घेतलं ..... गाढ झोप .... निर्वाणीची झोप ..... पावसानं शेवटी आपली जन्माची सोयरीक निभावली ....... त्या रात्री पावसानं नि पुरानं उरलंसुरलं अवघं कवेत घेतलं ....... त्याच्यासकट .....