Posts

Showing posts from 2019

alak ati laghu katha........ paus majha sobati

तो एकटक आभाळाकडे डोळे लावून बसला होता ..... महिन्यापूर्वीही तसाच आस लावून बसला होता सरी कोसळतील नि वाफाळून निघालेलं शेत आत आत भिजेल म्हणून ....पाऊस आला ..पेरणी झाली ...हिरवे तृणांकूर उगवले ..... वाढताहेत पिकं  म्हणून त्यानं समाधानाचा सुस्कारा सोडला ..... नि कूस फाटल्यासारखा पाऊस धो धो कोसळू लागला ..पाहता पाहता हिरव्या पिकांनी मान टाकली ...घरावरचं छप्पर उडालं ..गुरंढोरं  वाहून गेली ...बायका पोरं यांच्या किंकाळ्या .. गर्भवतींची ओली कूस ..म्हाताऱ्याकोताऱ्यांच्या असहाय हाका ....दूधपित्या मुलांचे आक्रोश ...... पाऊस वैरी झाला ......सोयऱ्यानीच वैर धरलं तर कुठं न्याय मागावा ?... आणि जपायला उरलंय तरी काय मागं ..... कोणासाठी जगायचं नि कुणाची आस धरायची?.... उजाड मनानं तो स्वतःशीच झगडत राहिला ..... झोपेनं त्याला कवेत घेतलं ..... गाढ झोप .... निर्वाणीची झोप ..... पावसानं शेवटी आपली जन्माची सोयरीक निभावली ....... त्या रात्री पावसानं नि पुरानं उरलंसुरलं अवघं कवेत घेतलं ....... त्याच्यासकट .....   
या खुळ्या ढगांनी मज केंव्हाच चित्त केले , माझ्या मुक्या दिशांचे देहभान मिटले .... मागेन मी म्हणालो ,माझे आभाळ वेडे ... .बरसून त्यांनी अवेळी  कंगाल मजला केले ......  स्मृतींत माझ्या हिरव्या ..... होती स्वप्ने धुंद बहूल ... .. वादळात थरारुन विझून ..... वाहून देशी दूर नेले ..... पाऊस असतो दिवाणा   .... . हे वेड बाळगून होतो ......    तो नाहीच सखया मित ... . मज आज हे कळून आले ........ 
हे नृत्य शुभंकर व कल्याणकारी असतं . त्या नृत्यात अनेक विभ्रम असतात . भ्रमाचे भयाकार असतात , नि संभ्रमाचे उदास सूरही ....सर्जनाची गर्ज असते नि संहाराचा त्रिनेत्रही असतो विजा कडाडतात तेव्हा घरं नि मनही हादरतात . या शिवनृत्याची अनिवार ओढही वाटते नि हे आपल्याला पेलवणारं नाही हे पण कळतं . आभाळ मळभलं की माणसाला उन्हाची ओढ वाटते ..उन्हं तापतात तेव्हा या मनस्वी पावसाची .... गंमत आहे .... अप्राप्याचं  कायम आकर्षण ...नेहमीच दुरस्थ स्वप्न क्षितिजासारखी साद घालतात . तृप्ती कशी ती नाहीच . हे हवे ,ते नको च्या चक्रात अडकलेलं त्याचं मन कडेकपारीतून धावणाऱ्या उन्मत्त मेघधारांसारखंच अज्ञाताच्या पाठी धावत असतं ....... बालकनीतून दिसणारा  घराच्या अंगणात उभा असलेला  माझा  आवडता बिल्ववृक्ष ......या ऋतूत त्याच्या शाखोपशाखांचा पर्णविस्तार नजरेत भरणारा असतो . हिरव्यागार बिल्वदलांनी समृध्द ..... शिवावर कोणी कितीही दळांची लाखोली वाहिली तरी त्याचं पर्णवैभव डौलात उभं असेल . पावसाच्या पडणाऱ्या कोटीतिर्थानी ती शुभस्नात होतात तेंव्हा या तांडव नृत्यालाही विलक्षण अर्थ येतो . काही पानं ...
श्रावणकिमया अचानक आभाळ गर्द झालं . धुक्याची चादर लपेटल्यागत आभाळानं धूसरपणा पांघरला नि चहूंकडून अंधारून आलं . अशावेळी पूर्वजन्माच्या सावल्या मनावर ठिबकाव्यात तसं मन दाट अंधारून जातं . पण या पाऊसवेणा असतात . तप्त धरित्रीच्या कुशीला शांत करणाऱ्या पावसाला त्यांत निमंत्रण असतं .... अबोल नि मूक निमंत्रण ..... धरेच्या मूक निमंत्रणाचा स्वीकार करून आभाळ वेडं वेडं होतं ....त्याचं मन सुपाएवढं होतं ...झांज ,टिपऱ्या नि ढोलक घेऊन तो स्वागतातूर मेघ धरित्रीला एखाद्या प्रियकराच्या ओढीनं भेटायला निघतो नि ती  एका क्षणात चिंब भिजून जाते .... पाऊस कसा धोधो कोसळू लागतो ...जलतुषार अगदी बारीक पण वेगाने आकाशाच्या चाळणीतून समत्वबुद्धीने ताल नि सूर लयीमध्ये घोंघावत झेपावतात . त्याचा आसमंत व्यापून टाकणाऱ्या ताल ,गती आणि लयीन आदिमकाळापासून आजतागायत चराचर सृष्टीला वेड लावलं आहे . विजेच्या गडगडाटाने पावसाला शिवशंकराच्या प्रलयनृत्याचं प्रतिमान येतं .. प्रवाही मी ,प्रमत्त मी असं म्हणत हे निसर्गाचं शिवतांडव खूप वेळपर्यंत चालू राहिलं तर सुरक्षिततेच्या कायम कवचात लपेटलेल्या माणसाला क्षण दोन क्षण भ...
कालच्या निष्पर्ण झाडांवर , आज नवी पालवी दिसली ...... शिशिराच्या या सर्द हवेत , मधुगंधाची  धुंदी हसली .... हसऱ्या आभाळाला कवेत घेऊन , बगळ्यांची माळ दिसली.......  वासंतिक सृष्टी रंग गंधात , न्हाऊन शृंगारून आली ...... तरी म्हणतोयस अजून वसंत ऋतूचं आगमन झालंच नाही ........   असं नतद्रष्ट व्हायचं नाही ..... ऋतुंशीही  ईमान राहावं .... . आतले ऋतु कोणतेही असू देत सृष्टीचेच होऊन राहावं ........ 
तुझा निर्मळ अमृत निर्झर तुझा निर्मळ अमृत निर्झर प्रेम -प्राण ,गंध -गीत ,प्रकाश पुलकित होऊन अखिल पृथ्वीलोकाला जलमय करत झरत आहे . आज दाहीदिशांची बंधनं तुटली आहेत . सर्व दिशांमध्ये आनंद मूर्त होऊन जागला आहे . माझंही जीवन आनंदरूपी अमृतानं ओतप्रोत झालंय . सार्थक्याच्या -कल्याणाच्या रस सरोवराच्या स्पर्शाने माझी जाणीव आनंदित होऊन कमळासारखी उत्फुल्ल झाली आहे ....  त्याचा सारा मधुरस तुझ्या चरणाशी आकंठ वाहू लागला . निर्बंध उषेची प्रभातीची लालिमा या निरव आकाशात माझ्या प्राणामध्ये जागली , माझ्या आळसावलेल्या डोळ्यांवरची झापड आता दूर झाली आहे . गुरूदेव रवींद्रनाथ ठाकूर --गीतांजली तून       अनुवाद -अपर्णा भागवत 
माझं मस्तक आपल्या चरणरजतळी नमव  ....... माझं मस्तक आपल्या चरणरजतळी झुकव प्रभू!माझा संपूर्ण अहंकार अश्रूंजलात धुऊन निघू दे . आपल्या खोट्या मोठेपणाला जपतांना मी केवळ आपली क्षुद्रताच दाखवतो . आपल्यातच बंदिस्त होत भटकून भटकून मी प्रतीक्षण मरतो . प्रभू !माझा संपूर्ण अहंकार अश्रूंजळात बुडवून दे .  माझ्या आत्ममग्न जगण्यानं माझं जीवन प्रचारित होऊ नये .  माझ्या जीवनाच्या माध्यमातून तू आपली इच्छा पूर्ण कर .  मी तुला परम शांतीची भीक मागतो आहे माझ्या प्राणात तुझी दिव्य आभा येऊ दे . माझ्या आड माझ्या हृदय-कमळी स्थित हो .  प्रभू !माझा संपूर्ण अहंकार अश्रूं जळात धुऊन निघू दे रवींद्र नाथ ठाकूर -गीतांजली तून       अनूवाद- अपर्णा भागवत . 
माझी जन्मांतरीची वेदना माझी जन्मजन्मांतरीची वेदनाच माझी जन्मांतरीची साधना आहे ,  आपला अग्नी तू प्रज्वलित होऊ दे , माझी दुर्बलता पाहून माझ्यावर कृपा करू नकोस , माझ्या वाट्याचं दुःख मी सहन करीन ., माझ्या वासना भस्मसात होऊ दे . तुझ्या अमोघ स्वरात  मला बोलाव ना  .. आता व्यर्थ विलंब करू नकोस ... माझ्या .छातीवरील सर्व बंधने तुटून जाऊ देत , तुझा शंखनाद उच्चं स्वरात होऊ दे , माझा सारा प्रसाद नि गर्व नष्ट होऊ दे ,नि तीव्र व प्रखर चेतना जागू दे . गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर -गीतांजलीतून  ( अनुवाद अपर्णा भागवत)
दूर कुठे दिवस कसा झुरत झुरत पाखरावाणी होतो ...  आभाळभर भिरभिरणारा जीव आत कासाविस होतो ... झुंजूमुंजू होतात दिशा अंधार झिरपत झिरपत येतो ...... कळसावरच्या चिमण्यांच्या  ... . डोळ्यांमध्ये कातरत जातो ... पाडसावानी हंबरु लागते  सारी सृष्टी लेकरूं होते पान्हा फुटल्यासारखी हलकेच ..... आभाळमाया दाटून येते ...... तारे सारे हसत हसत , आकाशाला रिंगण घालतात ... चंद्रकोरीसोबत गोलगोल . झिम्मापाणी   खेळू लागतात  ... क्षणांचाच खेळ सारा,  आशा नि निराशा .... सृष्टिच्याच कुशीत हसे.  कान्हा,तान्हा जीव जसा ......
मी जेव्हा दीप प्रज्वलित करतो तेव्हा तेव्हा तो मालवतो . म्हणून तुला माझ्या या झोपडीत अंधारात  बसावं लागलं .... माझ्या जीवन वेलीची मूळ शुष्क झाली आहेत , त्यावर कळ्या उमलतात  पण फ़ुलं उमलत नाहीत . माझ्या व्यथावेदना हाच नजराणा, आयुष्य भर केलेली सेवा फुलांचं वैभव ,पूजेचा महिमा , माझ्यापाशी काहीच नाही ....  तुझा हा पुजारी दिनवाण्या वस्त्रांत बसला आहे , त्याच्या  या ऊत्सवात कोणीही  भाग घेतला नाही , बांसरी वाजली नाही ,घर सजलं नाही ..... केवळ या मोडक्या झोपडीत रडत रडत मी तुला बोलावून आणलं आहे (रवींद्रनाथ ठाकूर यांच्या गीतांजली तून ). अनुवादक अपर्णा भागवत 
ज्या दिवशी हे वीर सैनिक ..... ज्या दिवशी ते वीर सैनिक आपल्या प्रभू कडून आले , त्या दिवशी प्रचंड शक्ती कुठं हरवून गेली ? शस्त्र कुठे गेले?/शौर्य कुठं हरवलं ?   क्षीण नी असहाय का झालेत ? दिशांनी अनर्गल प्रहार करणं सुरू केलं , प्रभूच्या घरुन त्यादिवशी जेव्हा वीर सैनिक आलेत .....  हेच सैनिक जेव्हा प्रभू गृही वापस गेलेत ..... प्रचंड शक्ती न जाणे त्यादिवशी परत कुठे हरवली , त्यांचे धनुष्य ,बाण ,तलवार कुठं गेले ? त्यांच्या चेहऱ्यावर प्रशांत आनंद झळकला , सांसारिक  जीवनाच्या  साऱ्या फळांचा त्याग करून ते गेले ......  
दरवाज्यावर थाप पडली कि काळजात होणारी हुरहूर वय ,काळ परिस्थितीप्रमाणे बदलतेच ना ? अरे आता आता तू आलास की हरखून जाणाऱ्या हृदयाची स्पंदनं कशी ,केव्हा आणि कुठे लोपली काळाच्या प्रवाहात समजलच नाही बघ ......  कुठे आत आत साठवून ठेवता आली असती तर मधुगंधासारख्या त्या आठवणींच्या स्पर्शानेच या एकाकी दिवसांना परिसस्पर्श झाला असता ना ....... घरट्यातून पाखरं दूरदेशी उडाली आहेत .....  . खिडकीच्या गजांमधून दिसणारं हे नीरभ्र आभाळही आपलंच आहे ....... प्रयोजनासाठी व्याकुळलेलं ....... . घेऊ या कवेत ......जगू या क्षणभर ...... स्वतःसाठी ...... स्वान्तसुखाय ....... 
एक स्वप्न ओठांशी आलं की आपसूक गाणं सुचतं ... .डोळ्यांत स्वप्नं उतरली की हिरवळीचे रान फुलतं               स्वप्नाचं बोट धरून चालू लागलं वाट की  आठवणीचं पात्र फुलतं , हृदयातल्या महानदीला मग उचंबळत पाणी फुटतं .... . घाटावरच्या तीर्थांना मग पावित्र्याचं रूप जडत ...... स्वप्नांना ऊर मिळाला तर आठवणींचा पान्हा दाटतो , कुठल्यातरी देव्हाऱ्यातला कान्हाही मग डोळ्यांत रुजतो ......  बघ आता काही स्वप्न हृदयांत साठवून ..... जपून ठेव गांधार क्षणांना आठवून आठवून 

bandist bet

आकाश ओथंबून खाली आलं नि मला विचारतं झालं कशाला तुझे डोळे उगाचच पाझरताहेत ? बघ या काळ्याकभिन्न मेघांनाही हिरवी स्वप्नं पडत आहेत ...... तृणांकुराच्या चैतन्याची लवथवती धार त्यांच्याही मुशीतून पाझरते आहे ......  स्वतःशी कधी रुसायचं नसतं जगणं कधी नाकारायचं नसतं शेवटी प्रत्येकाच्या आत बघ एक बंदिस्त बेट असतं ...... खूप किती साठलं दाटलं तरी पाझरत पाझरत वाहायचं असतं