हे नृत्य शुभंकर व कल्याणकारी असतं . त्या नृत्यात अनेक विभ्रम असतात . भ्रमाचे भयाकार असतात ,
नि संभ्रमाचे उदास सूरही ....सर्जनाची गर्ज असते नि संहाराचा त्रिनेत्रही असतो विजा कडाडतात तेव्हा
घरं नि मनही हादरतात . या शिवनृत्याची अनिवार ओढही वाटते नि हे आपल्याला पेलवणारं नाही हे
पण कळतं .
आभाळ मळभलं की माणसाला उन्हाची ओढ वाटते ..उन्हं तापतात तेव्हा या मनस्वी पावसाची ....
गंमत आहे .... अप्राप्याचं  कायम आकर्षण ...नेहमीच दुरस्थ स्वप्न क्षितिजासारखी साद घालतात .
तृप्ती कशी ती नाहीच . हे हवे ,ते नको च्या चक्रात अडकलेलं त्याचं मन कडेकपारीतून धावणाऱ्या उन्मत्त
मेघधारांसारखंच अज्ञाताच्या पाठी धावत असतं .......
बालकनीतून दिसणारा  घराच्या अंगणात उभा असलेला  माझा  आवडता बिल्ववृक्ष ......या ऋतूत त्याच्या
शाखोपशाखांचा पर्णविस्तार नजरेत भरणारा असतो . हिरव्यागार बिल्वदलांनी समृध्द ..... शिवावर कोणी
कितीही दळांची लाखोली वाहिली तरी त्याचं पर्णवैभव डौलात उभं असेल . पावसाच्या पडणाऱ्या कोटीतिर्थानी
ती शुभस्नात होतात तेंव्हा या तांडव नृत्यालाही विलक्षण अर्थ येतो . काही पानं किती लाजऱ्याबुजऱ्या ,काही
धीट ,तर काही भयकातर स्वभावाची आहेत म्हणून सांगू......लाजरी  पर्णराशी मेघतुषारांच्या नाजूक
स्पर्शानेही सलज्ज माना वेळावीत असते ..भयकातर पानं लहान अर्भकांसारखी दचकू लागतात तर काही धिटुकली पानं चक्क माना वर करून पावसाचा सामना करतात ..... प्रत्येकाच्या अस्तित्वाच्या जाणिवेचं
वैभव निरनिराळं ....... आणि या शाखोपशाखा तर जटाजूट शिवाच्या गंगाधारणेचीच आठवण करून देतात .  

Comments

Popular posts from this blog

पायवाट